*अखेर देसाईगंज सिटी सर्व्हेच्या कामाला सुरुवात!*


*अखेर देसाईगंज सिटी सर्व्हेच्या कामाला सुरुवात!*

*देसाईगंज सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष पिंकु बावणेंच्या उपोषणाचे फलित*

भास्कर फरकडे प्रतिनिधी

देसाईगंज-
       शहराच्या सिटी सर्व्हेचा तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते ९ एप्रिल २०१८ रोजी मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला होता.दरम्यान आवश्यक प्रमाणात रक्कम भरुनही भुमिअभिलेख कार्यालयाच्या गतिहीन भुमिके विरोधात देसाईगंज सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष यांनी भुमिअभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करताच धास्तावलेल्या संबंधित कार्यालयीन अधिकाऱ्यांनी धसका घेत काम सुरु करण्याची हमी भरत अखेर सिटी सर्व्हेच्या कामास सुरुवात केली असल्याने हे बावणे यांच्या आमरण उपोषणाचे फलित असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.
     देसाईगंज शहराच्या सिटी सर्व्हेसाठी येथील भुमिअभिलेख कार्यालयाच्या मागणीनुसार नगर परिषदेच्या वतिने जवळपास ८० टक्के रक्कम २०१८ मध्येच शासन जमा करण्यात आली होती. मात्र तब्बल पाच वर्षाचा कालावधी लोटुनही शहराचा सिटी सर्व्हे करून आखिव पत्रीका देण्यात न आल्याने येथील नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
      गरजु व पात्र लाभार्थ्यांना पक्के घर उपलब्ध करून देता यावेत करीता शासकीय स्तरावरुन प्रधानमंत्री आवास योजना,रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना यासह विविध योजना राबविल्या जात आहेत.या योजनांचा लाभ गरजु लाभार्थ्यांना देता यावा करीता नगर प्रशासनाने शहराचे सिटी सर्व्हे करून अतिक्रमण धारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्या संदर्भात देसाईगंज भुमिअभिलेख कार्यालयाच्या मागणीपत्रानुसार भुमापन कामासाठी ३ कोटी ४८ लाख रुपये शासन जमा केले आहेत. ही रक्कम एकुण मागणीपत्राच्या ८० टक्के असली तरी भुमिअभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कामचुकारपणाचा कळस गाठत विविध कारणे उपस्थित करत सिटी सर्व्हेचे काम तब्बल पाच वर्षापासून थंडबस्त्यात ठेवले होते.
      देसाईगंज शहराच्या गावठाण क्षेत्रातील नागरीकांना पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक असतांना शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करून सिमा निश्चित केल्या नसल्याने शासकीय स्तरावरुन राबविण्यात येत असलेली घरकुल योजना रखडत चालली होती.ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज सिटीझन फोरमचे उपाध्यक्ष पिंकु बावणे यांनी भुमिअभिलेख कार्यालयाला याबाबत वारंवार निवेदन देऊन समस्या अवगत करून देण्यासह आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.परंतु दिलेल्या इशाऱ्यालाही जुमानत नसल्याचे पाहू जाता २४ जानेवारी २०२४ रोजी भुमिअभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले असता भुमिअभिलेख कार्यालयाच्या हादरलेल्या यंत्रणेणे त्याच दिवशी उपोषण मंडपास भेट देऊन येत्या सहा महिन्यांत सिटी सर्व्हेचे काम पुर्ण करण्याची हमी भरली होती.त्या अनुषंगाने अखेर प्रत्यक्ष सिटी सर्व्हेच्या कामास सुरुवात केली असल्याने शहरवाशियांतुन बावणेंचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments