आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी भाई रामदास जराते


आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी भाई रामदास जराते

भाई शामसुंदर उराडे यांची मध्यवर्ती समीती सदस्यपदी नियुक्ती

गडचिरोली : भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्य २ व ३ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे १९ वे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात पुढिल ४ वर्षांकरीता पक्षाच्या नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे यांची पक्षाच्या मध्यवर्ती समितीवर सर्वानुमते निवड करण्यात आली.

मागिल अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय राहून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी सातत्याने रस्त्यावरचा लढा लढणारे भाई रामदास जराते यांच्या कार्याची दखल घेवून पक्ष सभासदांनी सलग दुसऱ्यांदा मध्यवर्ती समितीवर निवड केली. मध्यवर्ती समितीनेही त्यांना दुसऱ्यांदा पक्षाच्या चिटणीस मंडळावर संधी दिली. अनुसूचित क्षेत्रातील कायदे आणि आदिवासी व भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास व त्यासाठी त्यांनी चालविलेला संघर्ष लक्षात घेत पक्षाच्या चिटणीस मंडळाने आता भाई रामदास जराते यांची आदिवासी, भटक्या - विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती आहे.

आदिवासी, भटक्या - विमुक्त आघाडीची पक्षाने आपल्यावर जबाबदारी सोपविल्याने अनुसूचित क्षेत्रातील कायदेभंग, बळजबरी प्रकल्प आणि आदिवासी, भटक्या - विमुक्तांवरील अन्याय अत्याचारा विरोधात राज्यभरात आवाज बुलंद करु, अशी प्रतिक्रीया भाई रामदास जराते यांनी दिली आहे.

भाई रामदास जराते व भाई शामसुंदर उराडे यांच्या निवडी बद्दल पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, जेष्ठ नेते माजी आमदार संपतबापू पवार पाटील, कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, सहचिटणीस बाबासाहेब देवकर, राहुल देशमुख, उमाकांत राठोड, प्रा.एस.व्ही. जाधव, प्रा. बाबुराव लगारे, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, बाबासाहेब देशमुख, मोहन गुंड, जयश्रीताई जराते आणि जिल्ह्यातील शेकापच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिलेल्या आहेत.

0/Post a Comment/Comments